गंजलेल्या वीज खांबामुळे जीवितहानीचा धोका; महावितरणच्या दुर्लक्षामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप
पालघर! तारापूर माळी स्टॉप येथील शेतकरी गंगाधर माळी यांच्या शेतात उभा असलेला वीज वाहक खांब तळाशी पूर्णतः गंजल्यामुळे कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहे. सध्या सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसात या खांबाच्या कोसळण्याचा धोका वाढला असून, त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, जनावरे व परिसरातील इतर व्यक्तींच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
या घटनेकडे महावितरणचे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष करीत असून, एखादी दुर्दैवी घटना घडल्यानंतरच याकडे लक्ष देणार का? असा संतप्त सवाल शेतकरी गंगाधर माळी यांनी उपस्थित केला आहे.
अर्ज देऊनही दुर्लक्ष
गंगाधर माळी यांनी यासंदर्भात महावितरणच्या तारापूरजवळील देलवाडी कार्यालयात लेखी तक्रार सादर केली असून, खांब गंजल्यामुळे तातडीने त्याची दुरुस्ती अथवा बदल आवश्यक असल्याचे स्पष्टपणे नमूद केले होते. मात्र, कंपनीकडून अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आलेली नाही.
जीवितहानीची शक्यता
सदर खांबाची गंजलेली अवस्था पाहता, तो कोसळल्यास जिवंत वीज वाहक तारा थेट शेतात पडण्याची शक्यता आहे. परिणामी, गंभीर अपघात होण्याची शक्यता असून, त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकऱ्यांचा संतप्त सवाल
महावितरणचे अधिकारी काय जीवितहानी होण्याची वाट पाहत आहेत का? असा थेट सवाल गंगाधर माळी यांनी उपस्थित केला. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, जर एखादी दुर्दैवी घटना घडली, तर जबाबदार अधिकाऱ्यांवरच गुन्हा दाखल करावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
ग्राम भागातील शेतकऱ्यांच्या सुरक्षेकडे महावितरणचे हे दुर्लक्ष अत्यंत गंभीर असून, याबाबत तात्काळ कार्यवाही न झाल्यास संपूर्ण परिसरातील शेतकरी रस्त्यावर उतरण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिसरातील इतर शेतकऱ्यांनीही तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
वीज बिलासाठी तगादा, पण देखभाल कडे दुर्लक्ष
हे प्रकरण फक्त एका खांबापुरते मर्यादित नसून, तारापूरसह किनारपट्टी व ग्रामीण भागात अशा धोकादायक अवस्थेतील शेकडो खांब आहेत. वीज बिल वसुलीवर भर दिला जात असताना, देखभाल व दुरुस्तीकडे दुर्लक्ष केल्याने अनेकांचे प्राण धोक्यात आले आहेत. महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष न दिल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.
???? नागरिक व शेतकऱ्यांकडून मागणी — तातडीने दुरुस्ती करावी अन्यथा तीव्र आंदोलनाची तयारी!