चारोटी सब डिव्हिजनमधून वीजपुरवठा होणाऱ्या परिसरातील ग्रामस्थ त्रस्त !
पालघर !पालघर तालुक्यातील नानिवली आणि परिसरातील अनेक गावांमध्ये चारोटी सब डिव्हिजनमधून वीजपुरवठा केला जातो. मात्र गेल्या काही आठवड्यांपासून या भागात विजेचा सातत्याने लपंडाव सुरू असून नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. दिवसातून किमान सात ते आठ वेळा वीज खंडित होते, तर उर्वरित वेळेतही वीज कमी व्होल्टेज व डिंम स्वरूपात असते, अशी तक्रार ग्रामस्थ करत आहेत.
या भागात अजून पावसाळ्याला सुरुवातही झालेली नाही, तरीसुद्धा थोडा पाऊस पडला तरी वीज दिवसभर गायब राहते. यावरून पावसाळ्यातील परिस्थिती किती बिकट होऊ शकते, याची कल्पनाही करवत नाही.
ग्रामस्थांनी आरोप केला आहे की, वीज वितरण कंपनी (MSEB) कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करत नाही. पावसाळा तोंडावर आला असतानाही विजेचे पोल तपासले जात नाहीत, तसेच पोलजवळ असलेली झाडे कापून हटवण्याचे नियोजनही अद्याप झालेले नाही. परिणामी, वाऱ्याने झाडे पडून पोल व तारा तुटण्याचा धोका वाढतो आहे.
विजेचे पोल निकृष्ट अवस्थेत आहेत, काही तर पूर्णपणे निकामी झालेत. झाडे पोलांवर वाकलेली आहेत, मात्र त्याकडे कोणी लक्ष देत नाही. पोलवर झाड पडून मोठा अपघात होईपर्यंत MSEB वाट बघत आहे का? असा संतप्त सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
ग्रामस्थांची मागणी आहे की, पावसाळ्याआधीच सर्व लाईन तपासल्या जाव्यात, झाडे कापण्याचे काम तातडीने हाती घ्यावे आणि निकृष्ट पोल बदलले जावेत. अन्यथा पावसाळ्यात ही स्थिती गंभीर होऊन जनजीवन पूर्णपणे विस्कळीत होण्याची शक्यता आहे.